लोकशाही न्यूज नेटवर्क
खनौरी सीमेवर सुरक्षा कर्मचारी आणि आंदोलन शेतकरी यांच्यात झालेल्या चकमकीत बुधवारी भटिंडा येथील २२ वर्षीय शेतकरी शुभकरण सिंग ठार झाला. चकमकीत १२ पोलीस कर्मचारीही जखमी झाल्या आहेत. शुभकरणच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन तपासणीनंतर स्पष्ट होईल असं सांगण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभकरण सिंग यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. त्याला मृत अवस्थेत आणण्यात आले आणि प्राथमिक तपासणीत त्याला गोळी लागल्याचे दिसून आले. नंतरच आम्ही गोळीचे स्वरूप शोधू शकतो असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल आहे. सीमेवरील शेतकऱ्यांनी सांगितले की, पोलीस अश्रुधुराच्या गोळ्यांसह रबराच्या गोळ्या झाडतात. तर हरियाणा पोलिसांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगड आणि काठ्यांनी हल्ला केला. आप नेते आणि पंजाबचे आरोग्य मंत्री बलबीर सिंग यांनी पोलिसांच्या कारवाईला लोकशाहीची हत्या असे म्हटले आहे.
पोलिसांच्या गोळीबारात सिंग यांचा मृत्यू झाल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी केला, मात्र त्यांच्या मृत्यूच्या कारणाला दुजोरा मिळालेला नाही. शुभकरणच्या पोस्टमार्टम नंतर एफआयआर नोंदवण्यात येईल, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले