नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
कोराडी वीज प्रकल्पाजवळील खसाळा राख तलावाचा बांध फुटल्याने राख (Ash) वाहून गेली. राख वाहून गेल्याने नदी, नाले व नळयोजनेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हजारो एकरमध्ये ही राख ठेवण्यात आली होती. वीज प्रकल्पातून निघालेली राख येथे ठेवण्यात आली होती. येथील संरक्षण भिंतीला भेगा पडल्याची माहिती गावच्या सरपंचाकडून देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कन्हान नदीत राख वाहून गेली तर पिण्याच्या पाण्यावर परिणाम होईल. तसेच जमिनीवर सुद्धा याचा परिणाम होईल.
#WATCH | Maharashtra: A part of Khasala Ash Bund of Koradi Thermal Power Plant in Nagpur collapsed owing to heavy rainfall, leading to the submerging of all nearby villages in its wastewater & damage to crops pic.twitter.com/kYIkn5pmuO
— ANI (@ANI) July 16, 2022
राख बंधाऱ्यातून दुपारी १२ वाजेपासून ओव्हरफ्लोव पाण्याचा विसर्ग वाढतच आहे. नैसर्गिक आपदा लक्षात घेता संबंधित गावांना सतर्कतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा तातडीने दिला आहे. वीज केंद्र प्रशासन आणि जिल्हा प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. खसाळा राख बंधारा ३४१ हेकटर क्षेत्राचा असून सुमारे ७ किलोमीटर आतील जागेत राख साठवण करण्यात येते. ३.३० वाजताच्या सुमारास पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबविण्यासाठी वीज केंद्राकडून युद्धस्तरीय काम सुरू आहे.
काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने परिसरातील नदी, नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. अतिवृष्टीने कोराडी वीज केंद्रालगत खसाळा राख बंधारा येथील पाण्याची पातळी वाढल्याने बंधाऱ्यातून खसाळा, मसाळा, खैरी, कवठा गावांमध्ये नाल्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याचे प्राथमिक वृत्त कोराडी वीज केंद्रामार्फत कळविण्यात आले. वीज केंद्राचे मुख्य अभियंता व संबंधित अधिकारी तातडीने राख बंधारास्थळी पोहोचले तसेच जिल्हा प्रशासनाला याबाबत कळविण्यात आले आहे.