अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
माझ्या स्वागताच्या वेळी अमळनेरातील आश्रम शाळेच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याच्याशी मंत्री म्हणून म्हणून काहीही संबंध नाही, त्याची मला पुसटशीही कल्पना नव्हती, हेतुपुरस्कर तसा प्रकार कुणी केला असेल तर मुळीच सहन केला जाणार नसून कुणी चुकले असेल तर कुणालाही क्षमा केली जाणार नाही. अशी स्पष्ट प्रतिक्रिया मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून आपला खुलासा केला आहे.
राजकीय घडामोडी नंतर भाजप सरकारच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील मंत्री झाले. मंत्री पदाची शपथ घेतल्यांनंतर पहिल्यांदाच अनिल पाटील यांचे जळगावात आगमन झाले. त्यांचं भव्य स्वागत देखील करण्यात आले. मात्र मंत्री अनिल पाटील त्यांच्या अमळनेर मतदारसंघात गेले असता, त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा शाळकरी विद्यार्थ्यांना स्वागतासाठी उभे केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र याबाबत मला कोणतीही कल्पना नसल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, याबद्दल मला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती, खरे तर अशा पद्धतीने मुलांना उभे करण चुकीचे आहे. मला माध्यमातून माहिती कळाली असून याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी नेहमीच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो, वाढदिवसा निम्मित किंवा इतर वेळेस नेहमी विविध आश्रम शाळांना भेटी देऊन त्यांच्यासोबत जेवण करत असतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी उपयोग करण्याची मला आवश्यकता नाही, त्यांनी फक्त शिकून मोठे झाले पाहिजे, याच मताचा मी आहे. अशी प्रतिक्रिया मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.