भयंकर: उपोषण मंडपातच धरणग्रस्ताची आत्महत्या

शासनाच्या नाकर्तेपणाने घेतला नाहक बळी

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथून खळबळजनक घटना समोर आलीय.  येथील तहसील कार्यालयासमोर  गेल्या 254 दिवसांपासून अप्पर वर्धा धरणग्रस्ताचे विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे. राज्य शासनाच्या लोकप्रतिनिधीने उपोषणकर्त्यांच्या  मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने  धरणग्रस्तांच्या वतीने दि. 25 जानेवारी रोजी  वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला होता.

दिनांक 26 जानेवारीच्या रात्री  तहसील कार्यालयासमोर असलेल्या उपोषण मंडपात वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील  टाकरखेडा येथील धरणग्रस्त  गोपाल बाजीराव दहिवडे (वय 48)  या तरुणाने उपोषण मंडपात दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब काल शनिवारी सकाळी उघडकीस येताच  संपुर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना  राज्य शासनाच्या वतीने  धरणग्रस्तंच्या  मागण्या मंजूर न केल्यामुळे  सदर आंदोलन हे तीव्र होणार आहे. पोलिसांच्या वतीने सदर मृतदेह खाली काढण्यात आला असून  मृतदेह शवविच्छेदनासाठी  उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.  धरणग्रस्तांच्या वतीने  उपजिल्हा रुग्णालयासमोर चक्काजाम करण्यात आला होता. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे,  मोर्शी बेनोडा शिरखेड येथील पोलीस पथक तैनात करण्यात आले .

Leave A Reply

Your email address will not be published.