अमळनेरात विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

0

अमळनेर : नळ आल्यामुळे पाणी भरण्यासाठी पाण्याचा पंप सुरु करण्यासाठी प्लगमध्ये पिन लावताना विजेचा धक्का लागल्याने एका १२ वर्षीय शाळकरी बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना १ एप्रिल रोजी अमळनेर शहरात घडली.

तालुक्यातील सबगव्हाण येथील हर्षल योगेश पाटील (वय १२) असे मयत बालकाचे नाव आहे. हर्षल हा अमळनेर शहरातील साने गुरुजी शाळेतील सहावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील योगेश दगडू पाटील हे शेती करतात. शिक्षणासाठी तो आई, वडील व भावासह गलवाडे रस्त्यावरील साई गजाजन नगरात वास्तव्यास होता. १ रोजी त्याचे आई, वडील सबगव्हाण येथे शेतात तर मोठा भाऊ पेपर देण्यासाठी गेला होता. या वेळी हर्षल एकटाच घरी होता. दुपारी १ वाजता नळाला पाणी आल्याने हर्षल हा पाणी भरण्यासाठी विजेचा पंप सुरु करण्यासाठी
गेला. या वेळी मेल-फिमेल पिन जोडत असताना त्याचे हात ओले असल्याने नजरचुकीने त्याला विजेचा शॉक लागल्याने तो जिन्याखालीच कोसळला अन् मयत झाला.

हर्षलला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी ५ वाजता सबगव्हाण येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. हर्षलच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.