अमळनेर ;- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अमळनेर मराठी वाड्.मय मंडळाच्या वतीने आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहून विचार मांडणार आहेत.
दि ४ फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे त्यांचे वास्तव्य असून दुपारी २ च्या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
डॉ.गोऱ्हे ह्या स्वतः लेखिका असून त्यांच्यावर नुकतेच राजहंस प्रकाशनने “ऐसे पैस गप्पा नीलमताईंशी” प्रकाशित केले आहे. तसेच गोऱ्हे यांनी आपल्या शिवसेनेतील कारकिर्दीवर “शिवसेनेतील माझी २० वर्षे” या नावाचे पुस्तक लिहिले आहे. उरल्या कहाण्या’ या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचं श्रेष्ठता पारितोषिक मिळालं आहे. तर त्यांच्या पहिल्याच कथेला किर्लोस्कर पारितोषिक मिळालं होतं. नारीपर्व, माणूसपणाच्या वाटेवर, समाज आणि महिला, स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग, नव्या शतकासाठी महिला धोरण व अंमलबजावणी अशी काही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. २०२० सालच्या नोव्हेंबरमध्ये ‘समानतेकडून विकासाकडे : शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने’ हे आणखी एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. अंजली कुलकर्णी यांनी नीलमताईंच्या संघर्षगाथेवर ‘अपराजिता’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.
दिनांक ४ फेब्रुवारी रोजी डॉ. गोऱ्हे यांचे सकाळी १० वा. मराठी साहित्य संमेलन, अमळनेर येथे आगमन होणार आहे. सकाळी १०:३० वाजता अभिरुप न्यायालय आणि अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का ? यामध्ये त्या सरकारी मराठी भाषेसंदर्भात शासनाने राबविलेल्या योजना व उपक्रम व शासन करत असलेल्या प्रयत्नाबद्दल माहिती देतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता खुले अधिवेशन व समारोपात त्या सहभागी होऊन विचार मांडणार आहेत.