सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या राजकारणात अनेक घोटाळ्यांच्या दाव्यांवरून खळबळ उडतांना दिसत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा उघडकीस आणला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार असल्याची माहिती देत या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी सोमय्या यांनी दावा केला की, मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहेत. मतीन इंगोली हे मुश्रीफ यांचे जावई आहे. मतिन हे या कंपनीचे मालक आहेत. यातील 98 टक्के शेअर्स हे कोलकात्याचे आहेत. यात 2 टक्के हे हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांचे आहेत. कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी दिली, असंही सोमय्यांनी म्हटलं आहे. 2020 मध्ये कारखाना ब्रिक्स इंडियाकडे चालवण्यासाठी देण्यात आला.
तेव्हा सहकार मंत्रालयाने हा कारखाना दिला अशी माहिती सोमय्यांनी दिली. हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला अंबे मातेचं दर्शन घेता आलं नसल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तक्रार करणाऱ्यालाच अटक केली असल्याचा आरोप सोमय्यांनी यावेळी परिषदेत केला आहे. तक्रारदाराला रोखण्याचा इतिहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करू शकतात, असंही ते म्हणालेत.