सेवा साधना अनुष्ठान शिबिरात कळणार संस्कारांचे महत्व!

0

श्री योग वेदांत सेवा संस्थानतर्फे आयोजन : हजारो साधकांचा असणार सहभाग
जळगाव,  – सध्या जग वेगाने बदलत असून विज्ञान झपाट्याने प्रगती करत आहे. जग पुढे जात असले तरी मनुष्य आपले संस्कार विसरत चालला आहे. संस्कारांचा विसर पडल्याने पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण वाढू लागले आहे. पूज्य आसाराम बापू नेहमी संस्कारांना आणि भारतीय संस्कृतीला प्राधान्य देतात. त्यांनी वेलेन्टाइन डे ऐवजी मातृपितृ पूजन दिवस सुरू केला. मातृपितृ पूजन दिनाचे औचित्य साधत श्री योग वेदांत सेवा संस्थानतर्फे दोन दिवसीय सेवा साधना अनुष्ठान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत गणेश चौधरी यांनी दिली.

पूज्य आसाराम बापू आश्रम निवृत्तीनगर येथे घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला अनिल चौधरी, राजेश म्हस्के, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह साधक श्री योग वेदांत सेवा संस्थानचे पदाधिकारी उपस्थीत होते.

दोन दिवसीय सेवा साधना अनुष्ठान शिबीर
संस्थानतर्फे जिल्हाभरातील साधकांसाठी दि.१५, १६ फेब्रुवारी रोजी जळगावी निवासी सेवा साधना अनुष्ठान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी आजवर ७०० पेक्षा अधिक साधकांनी नोंदणी केली असून हजारावर साधक सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. शिबिरात योग साधना, प्राणायाम, ध्यान साधना आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच साधकांना नट मिल्क आणि ग्रीन ज्यूस देखील देण्यात येणार आहे. 

मातृपितृ पूजन दिवस हाच खरा प्रेम दिवस
वेलेन्टाईन दिवस हा पाश्चात्य संस्कृतीचे प्रदर्शन करणारा दिवस आहे. पूज्य आसाराम बापू यांनी दि.१४ फेब्रुवारी हा मातृपितृ पूजन दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. यावर्षी देखील जळगावातील आश्रमात हजारो साधकांच्या उपस्थितीत वृद्धाश्रमातील वृद्धांना बोलावून त्यांचे पूजन करण्यात येईल. पाल्यांकडून न मिळालेल्या प्रेमाची त्यांना जाणीव न होवू देण्यासाठी दिवसभर त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच प्रेमाचा खरा अर्थ इतरांना कळावा यासाठी त्या दिवसाचे महत्व तरुणाईला पटवून देण्यात येणार आहे.

पर्यावरण शुद्धीकरण सामुहिक यज्ञ
भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणाला मोठे महत्व आहे. सध्या पर्यावरणाचा मोठ्याप्रमाणात ह्रास होत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आश्रमात सामूहिक पर्यावरण शुद्धीकरण यज्ञ आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

स्वस्थ राहण्यासाठी अनमोल मार्गदर्शन
अलीकडच्या काळात मनुष्य जीवनात मोठमोठे रोग वाढताय. पूर्वी वयाच्या साठीनंतर होणारे आजार आज तारुण्यात बळावताय. आपल्या जीवनात काय चुका होताय, जीवनशैलीत काय बदल करायला हवे. रोग कसे रोखता येतील याविषयी डॉ.अतुल नारखेडे यांचे प्राकृतिक चिकित्सा, जीवनशैलीत बदल करून स्वस्थ राहण्याचा मूलमंत्र याविषयी अनमोल मार्गदर्शन साधकांना शिबिरात मिळणार आहे.

लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव शहरात होत असलेल्या या भव्य निवासी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन साधक श्री योग वेदांत सेवा संस्थानतर्फे करण्यात आले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.