मुंबई :– पुणे ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या “शिवनेरी’, “अश्वमेध’ बसेसच्या तिकीट दरात 80 ते 120 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे दर दि. 8 जुलैपासून लागू होणार आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.
गेल्या काही काळात मुंबई-पुणे महामार्गावर ओला-उबर यांसारख्या अॅपआधारित टॅक्सी कंपन्यांनी सेवा सुरू केली. विविध प्रकारे भाड्यांमध्ये सूट देऊन प्रवाशांची मने वळवण्यात या खासगी कंपन्यांना यश आले. यामुळे शिवनेरी आणि अश्वमेधचे प्रवासी पुन्हा मिळवण्यासाठी एसटीच्या वाहतूक विभागाने तिकीटदर कमी करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. भाडेवाढ अथवा कपातीसंदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार ही दरकपात करण्यात आली आल्याची माहिती महामंडळाने दिली.
संपूर्ण राज्यामध्ये सात मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरामध्ये 435 फेऱ्या होतात. यातून दरमहा सुमारे दीड लाख जण प्रवास करतात. मागील 15 वर्षांपासून पुणे ते मुंबई मार्गावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) “शिवनेरी’, “अश्वमेध’ या वातानुकूलित वसेस धावतात. मात्र, या त्यांचे तिकीटदर 500 रुपयांवर असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी याकडे पाठ फिरविली. तिकीटदरांच्या कपातीमुळे एसटीचा प्रवासी पुन्हा बसने प्रवास करण्यास सुरुवात करतील, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला.