वृत्त संस्था –
पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदी ११ हजार कोटींचा चुना लावून गेल्याची बातमी ताजी असतानाच रोटोमॅक पेन कंपनीचा मालक विक्रम कोठारी याने पाच बँकांना पाचशे कोटींचा चुना लावून पलायन केल्याची बातमी समोर आली आहे. पान परागचे मालक एम. एम. कोठारी यांचा मुलगा विक्रम कोठारी याने पाच सरकारी बँकांमधून ५०० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आणि तो पळाला आहे.
रोटोमॅक कंपनी कानपूरमध्ये आहे, त्याचा मालक विक्रम कोठारीने अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक या बँकांना ५०० कोटींचा चुना लावल्याचे उघड झाले आहे. ‘फर्स्ट पोस्ट’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
विक्रम कोठारीने ४८५ कोटींचे कर्ज युनियन बँकेकडून घेतले होते. तर अलाहाबाद बँकेकडून ३५२ कोटींचे कर्ज घेतले होते. हे कर्ज घेऊन एक वर्ष उलटले तरीही व्याजही दिले नाही किंवा कर्ज परतही केले नाही. धक्कादायक बाब म्हणजे कानपूरच्या सिटी सेंटर मधील रोटोमॅकचे ऑफिस गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. कर्ज घेतल्यापासून विक्रम कोठारी फरार आहे त्यांच्याबाबत कोणालाही माहिती नाही असेही समजते आहे. त्यामुळे पाच बँकांना ५०० कोटी पेक्षा जास्त रकमेचा चुना लागला आहे