मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
येत्या 2 दिवसांमध्ये मोसमी वारे माघारी जाणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मोसमी वारे परतीला जाण्यासाठी पूरक वातावरण असून, याचे परिणाम राज्यातील काही भागांवर दिसून येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मान्सूननं दिमाखात आगमन केलं होतं. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मान्सून मंदावल्यानंतर सप्टेंबर महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणांना मान्सूननं झोडपून काढलं आहे. यावर्षी राज्यात सर्व ठिकाणी सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. यानंतर आता राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यातून मान्सून परतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत.
Status of Withdrawal of SW Monsoon as on 11 Oct today.
परतीच्या पावसाची राज्यामधून आज पासून सुरवात
पूर्व विदर्भाच्या काही भागातून pic.twitter.com/ee5gTmvZ04— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 11, 2021
झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडीशा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात देखील मान्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील दोन दिवसात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधून पूर्णपणे मान्सून माघारी परतणार आहे. तर गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि ईशान्यकडील काही राज्यातील काही भागातून मान्सून माघारी जाणार आहे.
आज मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, सातारा, सांगली कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांतच याठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक असणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात उद्या कोरडं हवामान राहणार आहे. त्यानंतर बुधवार पासून राज्यात कुठेही पावसाचा इशारा देण्यात आला नाही. आज विदर्भातील काही जिल्ह्यातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसात संपूर्ण राज्यातून पाऊस गायब होण्याची शक्यता आहे.