इंफाळ । मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात म्यानमारनजीक एक मोठी घटना घडली. या भागात पीपल्स लिबरेशन आर्मी या स्थानिक गटातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफलच्या ३ जवानांना वीरमरण आले आहे. तर, चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांचा हवाला देत याबाबतचे वृत्त दिलं आहे.
दहशतवाद्यांनी या भागात सर्वप्रथम आयईडीने स्फोट घडवून आणला. ज्यानंतर त्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे तीन जवान शहीद झाले आहेत. ४ जवान गंभीर जखमी झाले आहेत. इंफाळपासून १०० किमी अंतरावर असलेल्या या भागात तातडीने सैन्याची जादा कुमक पाठवण्यात आली.भारतीय लष्कराकडून या भागात अतिरेक्यांना शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या बरोबरच भारत आणि म्यानमार सीमेवर देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चंदेल जिल्ह्यातच आसाम रायफल्सच्या छावणीवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. लष्कराच्या छावणीत अतिरेक्यांनी बॉम्ब फेकले होते. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. यानंतर अतिरेकी जवळच्या डोंगरावर पळून गेले. या हल्ल्यात सैन्यातील कोणताही जवान शहीद झाला नव्हता.