अवकाळी पावसाचा कहर, देशभरात 35 जणांचा मृत्यू

0

वीज कोसळून आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
नवी दिल्ली | न्यूज नेटवर्क
मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला नुकताच अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (१५ व १६ एप्रिल) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे तर राजस्थान आणि गुजरातमध्येही काही लोकांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे तिन्ही राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये हवामान विभागाने वादळाचा अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेशातली झाबुआ येथे अचानक हवामान बदलल्यानंतर मुसळधार पाऊस पडला. अनेकजण यामध्ये जखमी झाले आहेत. उदयपूर आणि झालावड येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उदयपूरमध्ये विजेचे जवळपास ८०० खांब आणि ७० ट्रान्सफॉर्मर कोसळले. अहमदाबाद, राजकोट, महेसाणा, साबरकांठा, आणंद भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे. तसेच मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.