मधमाशांच्या हल्ल्यात ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने नदीपात्रात कोसळले ; अपघातात चालक ठार

0

जळगाव;- नातेवाईकांच्या दशक्रियासाठी लाकडे घेवून जात असतांना अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर तापी नदीत कोसळल्याने ट्रॅक्टरचालकाचा दबुन जागीच मृत्यू झाल्याची घटना नांद्रा येथे गुरूवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे नांद्रा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

वासूदेव गोपीचंद सपकाळे (वय-४५ रा. नांद्रा ता.जि.जळगाव) असे मयत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. नांद्रा येथे वासूदेव गोपीचंद सपकाळे हे आपल्या पत्नी, दोन मुलं आणि मुलीसह वास्तव्याला होते. नांद्रा गावात त्यांच्या मामीचे निधन झाले होते. त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम असल्याने वासूदेव सपकाळे हे गुरूवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी लाकडे घेण्यासाठी ट्रॅक्टरवर एकटेच गेले होते. लाकडे भरून नांद्रा गावाकडे तापी नदीच्या रोडने येत असतांना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यामुळे त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर थेट तापी नदीत कोसळले. या अपघातात वासूदेव सपकाळे हे देखील पाण्यात पडले आणि त्यांच्या डोक्यावर ट्रॅक्टरचे स्टेअरींग पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर काही अंतरावर गावातील अजय दिलीप सोनवणे हा तरूण नदीच्या काठावरील विहीरीजवळ काम करत असतांना त्यांच्या लक्षात आले. त्याने आरडाओरड करत घटनास्थळी दाखल झाला, गावातील ग्रामस्थ व तरूणांनी धाव घेत वासूदेव सपकाळे यांचा मृतदेह बाहेर काढला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.