भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार

0

पुणे 

१ जानेवारी २०१८ रोजी  पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. याप्रकरणी एनआयए ने ८ जणांविरुद्ध १० हजार पानांचे आरोपपत्र विशेष एनआयए  न्यायालयात दाखल केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी यापूर्वी केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला देण्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाची मुदत गतवर्षी एप्रिल महिन्यात संपली होती. त्यानंतर त्याला मुदतवाढ मिळाली, मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे काम ठप्प होते. आता २ ऑगस्टपासून आयोगाचे कामकाज सुरू होत आहे. याप्रकरणी प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत.

भीमा कोरेगावच्या लढाईच्या स्मरणार्थ एल्गार परिषदेच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी गावात हिंसाचार झाला होता. काही संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. नंतर जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये, सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन, अरुण फेरेरा, वेर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि वरवरा राव या नऊ कार्यकर्त्यांना हिंसाचारात अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.