बंगालच्या उपसागरात निर्माण होणार चक्रीवादळ; राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

मागील आठवड्यापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा  पुढील काही तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून आजपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, मुंबई, ठाणे, पालघर, चंद्रपूर, भंडारा, गोदिया आणि गडचिरोली हे दहा जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने आज पुण्यासह, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या पूर्व विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारीही राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार असून औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच  मंगळवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 3-4 तासात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील चोवीस तासांत हे वादळ ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.