नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेने केला असतानाचं अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. पुढील 48 तासात पावसाचा जोर आणखी वाढेल, अनेक ठिकाणी वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल, अशा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अवकाळीचा शेतपिकाला मोठा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने देशभरातील शेतकऱ्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात गारपीटीसह पावसाने हजेरी लावली आहे. वाढलेल्या उष्म्यामुळे वातावरणात अनपेक्षित बदल झाला आहे. या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा असला तरी शेतपीकाच्या नुकसानीची धास्ती वाढली आहे. देशात इतर काही राज्यांतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
देशातही वादळी-वाऱ्याचा इशारा
उत्तराखंड, आसाम, मेघालय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोवा, तेलंगणा, केरळ तसेच माहे आणि जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालमधील मैदानी क्षेत्र, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, रायलसीमा, दक्षिणेकडील आंतरिक कर्नाटक आणि तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह वादळ येण्याचा अंदाज आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि उत्तर केरळमधील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या परिणामामुळे दिल्ली एनसीआरला मिळणारा दिलासा आता संपला आहे. उष्णता पुन्हा वाढू लागली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी दिल्लीत उष्णता वाढणार असून हवामान कोरडे राहील. तसेच तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतील.