मुंबई : आला थंडीचा महिना, चला शेकोटी पेटवा…. म्हणत देशात हिवाळ्यातील गुलाबी थंडीची मजा घेण्यात येत आहे. उबदार कपडे, गरमागरम चहा आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद नागरिक घेत आहेत. मात्र, अचानक वातावरणात बदल झाला असून पावसाचे ढग राज्यातील अनेक भागात जमा झाले आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
विशेषत: मुंबई आणि कोकण भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोलापूरमध्येही पावसाने रिमझिम सडा मारला असून दरम्यानच्या काळात हवामान खात्याने यापूर्वीच पावसाची शक्यता वर्तवली होती.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढच्या 3 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.
राज्यातील ‘या’ भागांत पावसाची शक्यता
दरम्यान आजपासून तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यात काही ठिकणी अवकाळी पावसाची हजेरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण, पालघर तालुक्यातील, बोईसर, पालघर, माहीम, केळवे, सफाळे, सातपाटी, भागात पाऊस सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.