नवी दिल्ली :- भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांवर एअर स्ट्राइक केला. एअर स्ट्राईकमध्ये नक्की किती दहशतवादी मारले गेले यावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यावरुन केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांनी विरोधकांवर टीका करत पुढच्या वेळी विरोधी पक्षातील नेत्यांना विमानाला बांधलं पाहिजे असे वक्तव्य केले आहे.
‘पुढच्या वेळी भारताने जर काही केलं तर मला वाटतं विरोधक जे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांना विमानाच्या खाली बांधून नेले पाहिजे. जेव्हा बॉम्ब सोडणार असतील तेव्हा टार्गेट बघून घेतील. त्यानंतर त्यांना तिथेच उतरवलं पाहिजे. यानंतर त्यांनी मोजणी करावी आणि परत यावं’, असं व्ही कें सिंग यांनी म्हटले आहे.
यापूर्वीही सिंह यांनी एक ट्विट करून लक्ष वेधून घेतले आहे. या ट्विटमध्ये व्ही.के. सिंह यांनी म्हटले आहे की, रात्री ३.३० वाजता खूप डास होते. मग मी हिट स्प्रे मारला. आता त्यानंतर मी किती डास मेले हे मोजत बसायचे का आरामात झोपी जायचे, असा सवाल व्ही.के. सिंह यांनी विचारला आहे. त्यांच्या या प्रश्नाचा रोख बालाकोटमधील एअर स्ट्राईकच्या दिशेने आहे.
व्ही.के. सिंह यांनी मंगळवारी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना फटकारले होते. दिग्विजय सिंह यांनी आपल्या एक ट्विटमध्ये पुलवामा हल्ल्याचा उल्लेख दुर्घटना असा केला होता. यावरून टीका करताना व्ही.के. सिंह यांनी म्हटले की, राजीव गांधींची हत्या दुर्घटना होती की दहशतवादी घटना? याचे उत्तर दिग्विजय सिंह यांनी द्यावे. त्यानंतर आपण पुलवामा हल्ल्यासंदर्भात बोलू, असा टोलाही व्ही.के सिंह यांनी लगावला होता.