मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आल्याने अनेक नियम राज्य सरकारने शिथील केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरल्याने हळुहळु महाविद्यालयासह आठवीच्या पुढील वर्गही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आठवीच्या पुढील वर्ग सुरू झाले असले तरी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र शाळा बंदच होत्या. दरम्यान, राज्यात पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याबाबत मंगळवारी बैठक पार पडली. तर या बैठकीदरम्यान चाईल्ड कोविड टास्क फोर्सने पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्यासाठी मंजूरी दिली आहे. शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने इतर बाबींची पूर्तता केली तर शाळा सुरू करायला काहीच हरकत नाही, असं चाईल्ड कोविड टास्क फोर्सकडून सांगण्यात आलं आहे.
चाईल्ड टास्क फोर्सने शाळा सुरू करण्याबाबत त्यांची संमती दिल्यावर कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तर येत्या दहा दिवसांमध्ये सर्वांशी चर्चा करून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग निर्णय घेऊ शकत असल्याचं टास्क फोर्सच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
ज्या वेळी लहान मुलांसाठी लस उपलब्ध होईल तेव्हाच लहान मुलांचं लसीकरण सुरू होईल. पण त्यापूर्वी लहान मुलांची शाळा सुरू करायला काहीच हरकत नसल्याचं टास्क फोर्समधील डॉक्टरांचं मत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पहिली ते सातवीच्या शाळांबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.