सोलापूर : केंद्रापासून अर्थात दिल्लीपासून गल्लीपर्यंत वातावरण खूप कडक आहे. पक्षाविरुद्ध कारवाया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पक्षात बक्षीसही मिळेल आणि शिक्षाही मिळेल”असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे गोपीनाथ गडावरील हल्ले पचवून परतलेले चंद्रकांत पाटील यांनी, पक्षशिस्तीसाठी कडक पावलं उचलण्याचं ठरवलेलं दिसतंय.
पक्षात काही मतभेद असतील, अडचणी असतील तर स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोला. अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. मात्र, रोज उठून पक्षाविरुद्ध कारवाई करत असाल तर कोणतीही गय केली जाणार नाही. सध्या वातावरण खूप वेगळे आहे, आपल्याला बक्षिसही मिळेल आणि शिक्षा देखील मिळेल असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावून चंद्रकांत पाटील काल सोलापुरात आले. आज त्यांनी सोलापुरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून, पक्षवाटचालीबाबत चर्चा केली.
कार्यकर्त्यांना इशारा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “विधानसभेत आपण पाहिले असेल, कोणाचीही गय केली गेली नाही. आता केंद्रापासून अर्थात दिल्लीपासून गल्लीपर्यंत वातावरण खूप कडक आहे. पक्षाविरुद्ध कारवाया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पक्षात बक्षीसही मिळेल आणि शिक्षाही मिळेल”