जळगाव । राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफ करू, असे आश्वासन दिले होते. मात्र आता, जेवढे बिल आले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. सरकारने यासंदर्भात योग्य भूमिका घेतली नाही, तर जनहितार्थ भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा रक्षा खडसे यांनी सरकारला दिला आहे.
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, ‘जेवढे बिल आलेले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल, असे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बिल माफ करू, असे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र नितीन राऊत हे एक चांगले नेते आहे. त्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता. संपूर्ण वीज बिल माफ करू शकत नसले तरी, काही प्रमाणात का होईना ग्राहकांना सवलत द्यायला हवी,” अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे.
एवढेच नाही, तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सातत्याने आंदोलनं करावी लागत आहेत. कारण भाजप हा वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहे, असेही खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.