नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांमध्ये करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत असली, तरी सणासुदीचा काळात नागरिक मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडल्याने करोनाबाधितांच्या संख्येतही भर पडतच आहे. याचबरोबर करोनामुळे रुग्णांचा मृत्यू होणेही सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये देशात ४८ हजार ४९३ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ४५ हजार ५७९ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय ५८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८९ लाख ५८ हजार ४८४ वर पोहचली आहे. सद्यस्थितीस देशात ४ लाख ४३ हजार ३०३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत ८३ लाख ८३ हजार ६०३ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, १ लाख ३१ हजार ५७८ रुग्ण आजपर्यंत करोनामुळे दगावले आहेत.
देशात १८ नोव्हेंबरपर्यंत करोनाच्या पार्श्वभूमीवर १२,८५,८,३८९ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. तर, यातील १० लाख २८ हजार २०३ नमुने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.