धक्कादायक! गेल्या १० महिन्यात १० हजार कंपन्या बंद

0

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात देशभरातील एकूण १० हजार ११३ कंपन्या बंद झाल्याचे माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. कोरोनाची झळ आणि लॉकडाउनचा फटका या कंपन्याना बसला. त्यामुळे या कंपन्यांनी स्वेच्छेने व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. यात महाराष्ट्रातील १२७९ कंपन्यांचा समावेश आहे.

 

एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात एकूण १०११३ कंपन्यांना कायमचे टाळे लागल्याची माहिती कंपनी व्यवहार खात्याच्या ताज्या आकडेवारीवरून समोर आली आहे. यातून हजारो कामगार देशोधडीला लागले. कंपनी कायदा २०१३ च्या कलम २४८(२) नुसार देशातील १०११३ कंपन्यांनी स्वेच्छेने व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनी व्यवहार राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत सांगितले. या कंपन्यांविरोधात कंपनी व्यवहार मंत्रालयाकडून कोणतीही कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाउनमुळे देशातील आर्थिक व्यवहारांना खूप मोठा फटका बसला. त्यामुळेच या हजारो कंपन्या बंद करण्यात आल्या, असे सांगितले जात आहे.

 

महाराष्ट्रात किती कंपन्या बंद?

लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी सांगितले की, ज्या कंपन्या आपल्या व्यवसायामधून बाहेर पडल्या आहेत त्यांची आकडेवारी मंत्रालयाकडे उपलब्ध नसते. मंत्रालयाने कंपन्यांविरोधात कारवाई केल्याने त्या बंद करण्यात आलेल्या नाहीत, असे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दिल्लीमध्ये सर्वाधिक म्हणजेच २ हजार ३९४ कंपन्या, यानंतर उत्तर प्रदेशमध्ये एक हजार ९३६ कंपन्या बंद पडल्या. सर्वाधिक कंपन्या बंद पडलेल्या यादीत अव्वल पाच राज्यांच्या यादीत तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा समावेश आहे. यापैकी तामिळनाडूत १३२२ कंपन्या, महाराष्ट्रात १२७९ कंपन्या आणि कर्नाटकमध्ये ८३६ कंपन्या बंद पडल्या आहेत.

 

पश्चिम बंगालमध्ये सर्वांत कमी कंपन्या बंद

चंडीगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ४७९ कंपन्या, तेलंगणात ४०४ कंपन्या, केरळमध्ये ३०७ कंपन्या, झारखंडमध्ये १३७ कंपन्या, मध्य प्रदेशात १११ कंपन्या, बिहारमध्ये १०४ कंपन्या, मेघालयमध्ये ८८ कंपन्या, ओडिसामध्ये ७८ कंपन्या, छत्तीसगडमध्ये ४७ कंपन्या, गोव्यात ३६ कंपन्या, पुदुच्चेरीमध्ये ३१ कंपन्या, गुजरातमध्ये १७ कंपन्या, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे चार कंपन्या बंद पडल्या. भारतातच भाग असलेल्या अंदमान निकोबारमध्ये केवळ दोन कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.