मुंबई । रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी रायगडपोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात आता, अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी गोस्वामी यांच्या अटकेचं स्वागत केलं असून तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या कारवाईबाबत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. अन्वय यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी पत्रकार परिषद घेत तात्कालीन पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
सुशांतसिंह राजपूतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्वण गोस्वामी यांचं नाव आहे, तरीही कारवाई का केली गेली नाही? असा सवाल नाईक यांच्या मुलीने केलाय. सातत्याने पाठपुरावा करुनही योग्य चौकशी करण्यात आली नाही. उलट आमच्यावरच सूडबुद्धीनं खटला दाखल केल्याचा आरोप लावण्याचा प्रयत्न झाला. पण आता मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचं आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया नाईक कुटुंबियांनी दिली आहे.
अर्णव गोस्वामी यांनी ६ कोटी ४० लाखापैकी आमचे ८३ लाख रुपये अद्याप दिलेले नाहीत. माझ्या वडिलांच्या आणि आजीच्या आत्महत्येला अर्णव गोस्वामीच जबाबदार आहेत, असा आरोप आज्ञा नाईक यांनी केला आहे. ‘अर्णव गोस्वामी यांनी पैसे बुडवल्याने माझे पती नवा प्रकल्प हाती घेऊ शकले नाहीत आणि त्यांनी आत्महत्या केली. आम्ही तक्रार केल्यानंतर धमक्या देण्यात आल्या. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केला आहे. रायगडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडून आम्हाला सातत्यानं तपास सुरु असल्याचं सांगितलं गेलं. पण त्यात कुठलीही प्रगती झाली नाही, अशी खंतही नाईक कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.