चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या अखेर व सप्टेंबर महिनाच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीसदुष्य अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती व शेती पिकांचे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसीलदारांमार्फत आज रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील हजारो एकर जमिनी आलेल्या महापुरात खरडुन गेल्या चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश गावात शेतामध्ये पाणी तुंबून हाता तोंडाशी आलेले कपाशी, मका, ज्वारी, बाजरी, उस सर्वच पिके खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून गेला. गेल्या दिड ते दोन वर्षात कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी पुरता कर्जबाजारी असताना पुन्हा पाऊसाच्या हाहाकाराने शेत पिके होत्याचे नव्हते झाले.
शेतकऱ्यांनी बॅंक, सोसायटी, खाजगी सावकाराकडून पैसा उभारून शेताच्या मशागतीला लावला. मात्र अतीवृष्टीने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी पिक विमा काढले असून संबंधित पिक विमा कंपन्याना राज्य शासनाने आदेश करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. त्यातच गेल्या ५ दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यावरील आभाळ प्रकोपाचे सावटामुळे दि. २८ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता तितूर व डोंगरी नदीला पाचव्यांदा पुर आला असून दुकानांमध्ये पाणी घुसले.
ढगफुटी सदृश्य पाऊस व गुलाब चक्रीवादळाचा मोठा तडाखा तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे उरल्या सुरल्या खरीप पिकांचा चिखल झाला आहे. झालेल्या नुकसानीमुळे शेतक-याच्या डोळ्यातूनही पुरच वाहू लागला आहे. सातही मंडळामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. आधीच कापसावर लाल्यारोग व बोडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. त्यात गेल्या ५ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कापसाची पूर्णपणे नासाडी होत आहे. त्यात अगोदरच उशिराने झालेले वरून राजाचे आगमन, सारखी पावसाची रिपरिप मुसळधार पावसासह वादळ, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
असे असताना १३७ गावांची पैसे जानेवारी ६५ पैशांसाठी अधिक आणेवारी लावण्यात आली होती. ही आणेवारी महसूल प्रशासनाने कमी करावी .महसूल प्रशासनाच्या वतीने पंचनाम्याचा सोपस्कार न करता सरसकट आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी. शेतकरी पुन्हा आत्महत्येच्या मार्गावर जाऊ नये म्हणून त्यांना पून्हा उभे राहण्यासाठी राज्य शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना आठ दिवसात मदत वाटप करावी.
अन्यथा रयत सेना शेतकऱ्यांना सोबत घेउन चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर उग्र आंदोलन करेल या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे मुख्यमंत्री यांना द्वारा चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांना दि ३० रोजी रयत सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रत कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष सचिन नागमोती, विद्यार्थी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष भरत नवले, विलास मराठे, खुशाल पाटील, सचिन पवार, भूषण चव्हाण, जामडीचे सरपंच जगन ओंकार भिल, आडगाव सरपंच रावसाहेब पाटील, रोकडे उपसरपंच अमोल पाटील, काका घोडेस्वार, गजानन चंदनशिव, छोटु अहिरे ,अभिमन्यू महाजन, विलास पाटील, मकरंद लोखंडे, संदीप मोरे, अभय पवार, गुलाब बोरसे, सुनील पाटील, जगन भिल्ल, शांतीलाल निकुंभ, काशिनाथ गवळी, रवींद्र पाटील, अंकुश पाटील, जयेश पाटील, विजय दुबे, विठ्ठल आखाडे यांच्यासह शेतकरी व रयत सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.