घराणेशाही नसून कोणाच्या जाण्याने पक्ष संपणार नाही भाजपाच्या जिल्हा बैठकीत ना. गिरीश महाजन यांचे प्रतिपादन
घराणेशाही नसून कोणाच्या जाण्याने पक्ष संपणार नाही
भाजपाच्या जिल्हा बैठकीत ना. गिरीश महाजन यांचे प्रतिपादन
जळगाव, दि. 29 – भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ते आहेत तोपर्यंत पक्ष चालेल, ए. टी नानांच्या जाण्याने पक्ष संपला का? पक्षाला काही फरक पडला का? असा सवाल विचारत मी म्हणजे पक्ष असे समजण्याचे काही कारण नसल्याची कान टोचणी ना. गिरीश महाजन यांनी केली.
दिसतोय फरक, शिवशाही परत, चला विधानसभा जिंकूया! हे ब्रीद घेवून भाजपाची जिल्हा बैठक शनिवारी दुपारी2 वा. बळीराम पेठेतील ब्राह्मण सभा येथे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, महापौर सिमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे – खेवलकर, आ. स्मिता वाघ, आ. राजुमामा भोळे, आ. चंदूभाई पटेल, जिल्हाध्यक्ष ग्रामीण डॉ. संजीव पाटील, संघटक अॅड. किशोर काळकर, प्रा. अस्मिता पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, नंदूरबारचे जिल्हाध्यक्ष नंदू चौधरी, गोविंद अग्रवाल, पोपटतात्या भोळे, माजी आ. बी.एस. पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. महाजन म्हणाले की, या निवडणुकीत जनतेने जात, धर्म पंथ, सोडून फक्त नरेंद्र मोदी, भाजपा व कमळ लक्षात ठेवूनच मतदान केले. पश्चिम बंगालमध्येही आम्ही आलो. विधानसभेत तेथेही सुपडा साफ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेला देशाच्या सिमेचे रक्षण करणारा पंतप्रधान हवा होता. भाजपाच्या 303 जागा पाहून विश्लेषकांचे डोळे फिरले. ही मोदींची हवा नाही तर त्सुनामी होती. कार्यकर्ते मात्र उदासिनपणे बोलतात ते टाळले पाहिजे. या यशाने हुरळून न जाता तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसा फिक्स समजण्याचे कारण नाही. तेव्हा देशाचे नेतृत्व होते. आताही राज्यातील जनतेला पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असा विश्वास लोकांना वाटत आहे.
50 चा आकडा राष्ट्रवादी व काँग्रेस पार करणार नाही
येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस 50 चा आकडा पार करु शकणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी केलेल्या खोट्या प्रचारावर लोकांचा विश्वास नाही. तसेच राज्यात ठाणे सोडली तर शिवसेना कुठेही नाही. राज्यातील महापालिका भाजपकडे आहेत. जळगाव, धुळे, नाशिक पालिकेत सत्ता, नगरला महापौर नगरला 55 +च्याऐवजी 57, धुळ्यात 50, नाशिकला 60+च्या ऐवजी 67 अशा जागा मिळाल्या आहेत. भाजपाचाच बोलबोला असून घौडदौड वेगाने चालू आहे. जगात सर्वात जास्त सदस्यसंख्या असलेला पक्ष आहे. तरी जमिनीवर राहून काम करायचे आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 10 हजार कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. तरुण वर्गाची मानसिकता भाजपाकडे आहे.
पारोळ्याची जागा येईल
जिल्ह्यातील11 विधानसभेच्या जागा निवडून येतील. पारोळ्याची जागाही भाजपाला मिळेल हे सांगण्यास ज्योतिष्याची गरज नाही. सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा. जिल्ह्याला सर्व प्रकारचा निधी मिळाला आहे. आता रडायचं नाही तर लढायचं! आपण केलेली कामे सांगायची शंभर टक्के लोकांची मानसिकता आहे. तीन महिन्यांनी निवडणुका आहेत. आचारसंहिता लागण्याची केवळ 720 तासांचा अवधी आपल्याकडे बाकी असून सदस्यता व मतदार वाढवायचे आहे. असे कान त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकार्यांचे फुंकले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मताधिक्क्याने निवडून आल्याबद्दल खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल डॉ. संजीव पाटील, शशीकांत वाणी, नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल रोहिणी खडसे- खेवलकर, वाढदिवसानिमित्त हर्षल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. राजुमामा भोळे यांनी केले. अॅड. दिलीप पोकळे यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्यशासनाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, अॅड. किशोर काळकर, प्रा. सुनिल नेवे, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील,पोपट तात्या भोळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
हवेत राहू नका राज्यात भाजपा सरकार आणा- आ. खडसे
दोन्ही खासदारांनी लोकसभेत मिळविलेल्या यशाने हवेत जावू नका. विरोधकांचे एकच सुत्र राहील भाजपला हटवा. त्यात मित्र पक्षही असेल असा चिमटा काढत सगळे एकीकडे व आपण दुसरीकडे असा सामना राहणार आहे त्यामुळे लीड विसरा बुथ प्रमुखांनी किमान एक मत जास्त मिळवा, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केले. राज्य सरकारने आरक्षणाचा अवघड तिढा सोडविला. जिल्ह्यात आपल्याला एक आमदार वाढवायचा आहे. शंभर किंवा पन्नासच्या खाली भाजपाला मतदान झालेल्या मतदारसंघांचा अभ्यास करा. कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांनी चांगले दिवस आणावे. कामाला लागा राज्यात भाजपाचे सरकार आणण्याचा प्रयत्न करा, असे अवाहन त्यांनी केले.
खासदारांच्या विजयाचे आश्चर्य नाही
आपण राजनाथ सिंह यांना भेटीदरम्यान दोन्ही खासदार विजयी झाल्याचा आनंद आहे आश्चर्य नसल्याचे सांगितले आहे. कारण जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. आतापर्यंत 17 खासदार जिल्ह्याने भाजपाला दिलेले आहेत. 27 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षपद, जिल्हाबँक, दुध फेडरेशन, 14 पंचायत समित्या, महानगरपालिका आदीत जिल्ह्यात शंभर टक्के भाजपा आहे. त्यामुळे विधानसभेतही असेच यश हवे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. लोकसभेत मोदींनी लोकांना हिप्नोटाईज केले होते. तिच परिस्थिती विधानसभेत राहणार नसल्याने हवेत न राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.