खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
दि. 28.12.2021 रोजीच्या अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती खामगांव येथे अनेक शेतकरी बांधवांचा शेतमाल कृउबासमध्ये विक्री करण्याकरीता आणला असता सदर माल प्रशासक तथा सचिव यांच्या हलगर्जी व अनियमित नियोजनामुळे अवकाळी पावसामुळे लाखो रूपयांचा शेतमाल पावसात भिजुन नुकसान झाले आहे व त्याच शेतमालाला व्यापारी बांधवांनी कमी भाव देवुन एकप्रकारचे शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान केलेले आहे.
याचे एकमेव कारण असे की, कॉटन मार्केट यार्डमध्ये अनेक दिवसांपासून व्यापारी व अडत्यांचा शेतमाल स्टॉक करून ठेवल्यामुळे शेतकरी बांधवांना माल हा शेडमध्ये टाकता येत नाही म्हणून नाईलाजास्तव शेतकरी बांधवांना खुल्या जागेत शेतमाल टाकावा लागतो त्याचे एकमेव कारण असे की, प्रशासक व सचिव यांचे अडत्या व व्यापारी यांचेशी लागेबांधे असल्यामुळे तो माल उचलण्यास कोणत्याही प्रकारची सुचना किंवा पत्र अद्यापपर्यंत दिले नाही किंवा कारवाई केलेली नाही.
त्यामुळे सदर नुकसान भरपाई ही सचिव व प्रशासक यांचेकडून वसुल करण्यात यावी. तसेच तात्काळ शेडमध्ये अनेक दिवसांपासून स्टॉक ठेवलेला माल त्वरीत काढण्याच्या सुचना देण्यात यावी व पुन्हा असा प्रकार होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशी तक्रार आनंद गायगोळ मनसे शहर अध्यक्ष यांनी संबंधितांना दिली आहे.