तोंडापूर. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील शेतकरी ज्ञानेश्वर पांडुरंग पाटील (वय ४७) आज सकाळी साडेआठच्या सुमारास स्वत:च्या शेतात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
येथील ज्ञानेश्वर पाटील सकाळी सातच्या सुमारास भारुडखेडा रस्त्यावरील स्वत:च्या शेतात गेले. त्यांनी सकाळी साडेआठच्या गळफास घेतला. शेता शेजारी असलेल्या संतोष गायके शेतात मजूर सोडण्यासाठी गेले असता, त्यांना बाभूळच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने ज्ञानेश्वर पाटील यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी ही बाब आबा पाटील यांना कळविली.
आबा पाटील यांनी ज्ञानेश्वर पाटलांच्या पुतण्याला माहिती दिली. त्यावरून पोलिसपाटील पती जितेंद्र पाटील व अमोल पाटील यांनी घटनास्थळ येऊन पाहिले असता, त्यांना झानेश्वर पाटील यांनी झाडाला दोरीच्या साहाय्याने गळाफास घेतल्याचे आढळले.
घटनेची माहिती कळताच डिंगबर पाटील, नाना पाटील व गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. दरम्यान, ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील उत्पन्नात घट झाल्यामुळे त्यांनी हे पाउल उचले असावे, असे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात दोन मुले व पत्नी आहे. ते स्वत: शेतीकामे करीत होते.
याबाबत पहूर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावरून हवालदार अनिल सुरवाडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. ज्ञानेश्वर पाटील तोंडापूर परिसरात कडक नाना नावाने परिचित होते.