नागपूर: ऐन हिवाळ्यात विदर्भात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडला. गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या गडगडाटी मुसळधार पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पहाटे अचानक झालेल्या या पावसामुळे किमान तापमानात घट होऊन विदर्भात कडाक्याची थंडी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कापूस, तूर, चणा ही पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे.
गुरुवारी मध्यरात्रीपासून नागपूर शहरासह विदर्भातील यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात अखंड वृष्टी सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अकोलाबाजार येथे सगळा कापूस ओला झाला आहे. बिजोरा भागात पडलेल्या गारांमुळे शेतीचे अनोतान नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील टाकरखेड येथे तूर, चना व कापूस ही पिके आडवी झाली आहेत. मोठ्या बोराएवढ्या आकाराच्या गारांनी अनेक घरांची कौले फोडली तर शेतीचे नासधूस केली आहे. हा पाऊस दिवसभर राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.