आधुनिक वैद्यकशास्त्र आणि प्राचिन आयुर्वेदशास्त्र यांची सांगड घालून सखोल संशोधन करण्याची गरज

0

सुप्रसिध्द हृदयशल्य चिकित्सक पद्मविभूषण डॉ. एम.एस.वलियाथन यांचे प्रतिपादन

जळगाव;- आधुनिक वैद्यकशास्त्र आणि प्राचिन आयुर्वेदशास्त्र यांची सांगड घालून सखोल संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सुप्रसिध्द हृदयशल्य चिकित्सक पद्मविभूषण डॉ. एम.एस.वलियाथन यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि झेड. बी.पाटील महाविद्यालय,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशोवल्लभ व्याख्यानमालेत पद्मविभूषण डॉ. एम.एस.वलियाथन यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले यावेळी ते बोलत होते.

कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ.वलियाथन यांनी “सायंटिफिक रिसर्च बेस ऑन आयुर्वेदिक क्युज” या विषयावर सविस्तर मांडणी करतांना आयुर्वेदाच्या प्राचीन पंरपरेचा आढावा घेतला. आयुर्वेदाला मोठी प्राचीन परंपरा आहे. अथर्व वेदात आयुर्वेद शास्त्राचे वर्णन केलेले आहे. त्यामुळे अथर्व वेदाला आयुर्वेदाचे उपवेद मानले जाते. चरकसंहिता आणि सुश्रृतसंहिता यामध्ये आयुर्वेदाच्या उपचार पध्दतीविषयी सविस्तर माहिती आहे.

परदेशातील लोकांना आयुर्वेदाचे महत्व पटत असल्यामुळे ते अभ्यास करू लागले आहेत. आपल्याकडे केरळात ही समृध्द परंपरा जोपासली गेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान युगाचा विस्तार झपाट्याने होत आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र देखील विस्तारले आहे. तरी देखील आयुर्वेदाचे महत्व कमी झालेले नाही. अॅलोपॅथीचे काही तज्ज्ञ आयुर्वेदाकडे वळाले आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या काही मर्यादा असल्यातरी आयुर्वेद आणि वैद्यकशास्त्र यांची सांगड घालून निराकारण केले जावू शकते. डॉ. वलियाथन यांनी निरनिराळे आधार, वातप्रकोप यांचे जीनोमिक तंत्रज्ञानाने पृथक्करण प्रक्रीया स्पष्ट केली

आयुर्वेदाने अल्सर, कर्करोग यासारखे दुर्धर आजार कसे बरे करता येतील याबाबत सखोल संशोधनाची गरज आहे असे ते म्हणाले. आयुर्वेदीक जीवशास्त्राविषयी त्यांनी सविस्तर मांडणी केली.
यशोवल्लभ व्याख्यानमालेचे प्रमुख अॅड गिरिधरभाई गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. वैद्यराज पी.टी. जोशी यांनी संस्कृतमधून धन्वंतरी प्रार्थना सादर केली. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी काळाच्या ओघात आयुर्वेदाचे महत्व आता पटू लागले आहे. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक शास्त्र यांची स्वतंत्र बलस्थाने असली तरी मानवी कल्याण आणि मानवी आरोग्य हे दोन्ही ठिकाणी महत्वाचे असल्याचे सांगितले. प्रा. राम भावसार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्राचार्य डॉ.पी.एच.पवार यांनी आभार मानले. डॉ. वलियाथन यांच्या व्याख्यानाचा ७०० जणांनी यु ट्यूब द्वारे लाभ घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.