अब की बार ४६ डिग्री पार : उष्णतेने महाराष्ट्र होरपळला

0

पुणे – विदर्भ आणि मराठवाडा चांगलाच तापला असून, काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे शुक्रवारी तापमानाने उच्चांक गाठला. तर यावर्षी मध्य महाराष्ट्रातील नागरिकही उष्णतेची लाट काय असते, याचा अनुभव घेत आहे. गेल्या 24 तासांत पुणे शहरातील कमाल तापमानामध्ये एक अंशाने वाढ झाली असून, मागील दहा वर्षांतील उच्चांक मोडत कमाल तापमानाने तब्बल 42.6 अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. तर राज्यातील सर्वाधिक तापमान ४६.८ अंश सेल्सिअस अकोल्यामध्ये नोंदविण्यात आले.

एप्रिलच्या अखेरीस दररोज कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होत असल्यामुळे दुपारच्यावेळी अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विदर्भ व मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवला. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याने रणरणते ऊन आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात शुक्रवारी सकाळपासून तीव्र उन्हाच्या झळा जाणवत होत्या. दुपारनंतर वातावरण अजून तापले. घामाच्या धारा आणि अंगाची लाहीलाही होणाऱ्या तीव्र झळांमुळे नागरिक अस्वस्थ होते.

राज्यात अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, परभणीमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविण्यात आला. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे होते. महाबळेश्वर आणि कोकण विभाग वगळता सर्वच ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे होता. राज्यातील नीचांकी तापमान २२.६ अंश सेल्सिअस अहमदनगरमध्ये नोंदविण्यात आले.

सकाळी दहापासूनच रस्त्यावर उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली. संध्याकाळीही उकाडा कायम होता. उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक टोपी, छत्री, गॉगल, स्कार्फ अशी तयारी करून घराबाहेर पडले होते. रस्त्याच्या कडेला सरबत, लस्सी, रसवंतीगृहे, आइस्क्रीमच्या दुकानांबाहेर दिवसभर लोकांची गर्दी होती. संध्याकाळी घरात बसण्याऐ‌वजी लोक पादचारी मार्गांवरील बाकड्यांवर, बागांमध्ये रेंगाळले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.