उदयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मोहम्मद पैंगबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि भाजपातून प्रवक्तेपदावरुन हटविण्यात आलेल्या नुपूर शर्माचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली म्हणून एका व्यक्तीची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उदयपुर में युवक की जघन्य हत्या की भर्त्सना करता हूं। इस घटना में शामिल सभी अपराधियों कठोर कार्रवाई की जाएगी एवं पुलिस अपराध की पूरी तह तक जाएगी। मैं सभी पक्षों से शान्ति बनाए रखने की अपील करता हूं। ऐसे जघन्य अपराध में लिप्त हर व्यक्ति को कड़ी से कड़ी सजा दिलाई जाएगी।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) June 28, 2022
राजस्थानातील उदयपूरमध्ये हा प्रकार घडला आहे. हल्लेखोर मंगळवारी दिवसाढवळ्या या व्यक्तीच्या दुकानात शिरले आणि त्याचा गळा कापण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओही तयार करण्यात आला आहे. इतकंच नाही तर या व्यक्तीच्या हत्येनंतर आरोपींनी सोशल मीडियावर हत्येची पोस्ट टाकत त्याची जबाबदारीही स्वीकारली आहे.
धानमंडी येथील भूतमहल परिसरात कन्हैय्यालाल तेली यांचे सुप्रीम टेलर्स नावाचे दुकान होते. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास बाईकवर दोन गुंड आले. कपड्यांचे माप देण्याच्या बहाण्याने ते दुकानात शिरले. कन्हैय्यालाल यांना काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकापाठोपाठ एक अनेक तलवारींचे वार त्यांच्यावर करण्यात आले. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच जवळच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिकची टीमही पोहचली. त्यानंतर घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्यात आले. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी पोलीस अधीक्षकांना फोन करुन घटनेची माहिती घेतली आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करत, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कन्हैय्यालाल हे गोवर्धन विलास परिसरात राहत होते. १० दिवसांपूर्वी कन्हैय्यालाल यांनी भाजपा प्रवक्त्यापदावरुन हटवण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमक्या देण्यात आल्या होत्या. सतत येत असलेल्या या धमक्यांनी कन्हैय्यालाल हैराम झाले होते. त्यामुळे सहा दिवस त्यांनी त्यांचे दुकान उघडलेच नव्हते. तसेच धमक्या देणाऱ्या तरुणांविरोधात पोलीसांत तक्रारही नोंदवली होती. पोलिसांनी थोडे दिवस सांभाळून राहा असे सांगू या धमक्यांना गांभिर्याने घेतले नव्हते.
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून तातडीने पावले उचलण्यात आली. तातडीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंडोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला. यानंतर त्या ठिकाणी राहणाऱ्यांनी आंदोलन केले. मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. शहरातील ५ परिसरातील बाजार बंद करण्यात आले आहेत. अत्यंत निर्घृणपणे ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात काही आरोपींची ओळख पटली असून, त्यांना पकडण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. आरोपींच्या तपासासाठी टीम रवाना करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.