नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
अनेक ठिकाणी टोलच्या दरात वाढ झाली आहे. संपूर्ण देशात 1 एप्रिल पासून टोलवसूली (Toll Collection) नव्या स्वरूपात होत आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे काही ठिकाणी नव्याने टोल सुरू झाले आहे. त्यामुळे बहुतांश जणांना टोलबाबत माहिती नसल्याने बऱ्याच ठिकाणी गोंधळ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टोलवरील वाद दिवसेंदिवस वाढत असतांना साई बाबांच्या (Sai Baba) दर्शनाला जाण्याचा विचार करत असल तर आणखी एका टोलची भर पडणार आहे. यामध्ये नाशिकच्या (Nashik) सिन्नर ते शिर्डी (Shirdi) महामार्गावर टोल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांच्या खिश्याला मात्र कात्री लागणार आहे.
पिंपरवाडी येथील टोल सुरू करत असतांना काही सूट देण्यात आली आहे. यामध्ये अव्यावसायिक वाहनांना 330 रुपयांचा पास घ्यावा लागणार आहे. टोल सवलतीसाठी स्थानिक नागरिकांना टोल कार्यालयात कागदपत्रे देऊन नोंद करावी लागणार आहे. यामध्ये टोल वसूल करण्यासाठी सरकारची नवी प्रणाली म्हणजेच फास्टॅगच्या माध्यमातून केला जाणार आहे. कार, जीप आणि व्हॅनसाठी एका बाजूने 75 शुल्क आकारले जाणार आहे. त्यामध्ये मिनीबस आणि एलसिव्ही आणि एलजिव्ही वाहनांसाठी 125 आणि त्यानंतर इतर मोठ्या वाहनांसाठी 260 पासून 500 रुपये पर्यन्त शुल्क आकारले जाणार आहे.
नाशिक आणि मुंबई च्या दिशेने जाणारे नागरिक हे सिन्नर मार्गे शिर्डीला जातात. त्यांच्या करिता हा टोल प्लाझाचा अतिरिक्त खर्च वाढणार आहे. तर नाशिकच्या दिशेने शिर्डीवरून पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनाही याचा अतिरिक्त खर्च वाढणार आहे. या टोलमुळे सिन्नर ते शिर्डी हा महामार्ग सुस्थितीत राहील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत असून अनेक प्रवासी या महामार्गाची स्थिती पाहून संताप व्यक्त करत होते.