जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
घटना अशी की, 17 जूलै रोजी अश्विनी व तीची लहाण बहिण पायल या दोघी शेतातून घरी जात होत्या. यावेळी गावातच राहणाऱ्या दिलीप जगन सोनार व वासुदेव रायसिंग चव्हाण या दोन तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला. छेड काढण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी हुल्लडबाजी केली. या प्रकारामुळे दोघी बहिणी घाबरल्या होत्या. यांनतर तरुणांनी ‘आम्ही तुमचे लग्न होऊ देणार नाही, तुमच्या अंगाला हळद कशी लागते? तेच पाहतो’अशी धमकी दिली. त्यामुळे अश्विनी व पायल भेदरल्या होत्या. तरुणांपासून स्वत:ची सुटका करुन घेत त्या कशाबशा घरी पोहोचल्या.
तरुणांनी धमकी दिल्याने दोन बहिणींमधील एकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी धमक्या देणाऱ्या दोन तरुणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. अश्विनी राजू राठोड (वय 14, रा. लोणजे, ता. चाळीसगाव) असे मृत मुलीचे नाव आहे.
दरम्यान, दिलीप व वासुदेवने दिलेल्या धमक्यांमुळे अश्विनी पुर्णपणे घाबरली होती. तीला काहीच सुचत नव्हते. हे दोघे आपले लग्न होऊ देणार नाही, पायलसोबत देखील काही गैरप्रकार करतील अशी भीती तिच्या मनात भरली होती. याच भीतीपोटी अश्विनीने त्याच रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या घटनेमागचे कारण स्पष्ट होत नव्हते. नंतर पायलने कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
कुटुंबीयांनी हीच माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी संपुर्ण चौकशी केली असता दिलीप व वासुदेव हे दोघे प्राथमिक चौकशीत दोषी आढळले. त्यानुसार मृत अश्विनीची आई अनुसयाबाई राठोड यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन दोघांच्या विरुद्ध अश्विनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार तपास करीत आहेत.