मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच आता शरद पवारांनी गौप्यस्फोट केला आहे.
ग्रेस आणि आमच्या पक्षात फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्हीसुद्धा गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, त्याचवेळी उद्धव ठाकरे आपल्याच विचारधारेचे आहेत. ते समविचार आहे, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
काय म्हणाले शरद पवार
देशाच्या राजकारणातील जेष्ठ नेते शरद पवार नेहमी चर्चेत असतात. अनेक वर्षे काँग्रेस पक्षात घालवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. परंतु त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार यांनी आता एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात धक्कादायक दावे केले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील प्रादेशिक पक्षांच्या भवितव्या बाबतही मोठी विधाने त्यांनी केली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
सहकाऱ्यांशी करणार चर्चा
शरद पवार यांना हा पर्याय राष्ट्रवादीसाठी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही. या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचाराची आहे. परंतु यावर मी सहकाऱ्यांच्या सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही. परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे कठीण आहे.