लोकशाही न्युज नेटवर्क –
महाराष्ट्राच्या राजकारणाला गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं काही नवी वळणं मिळाली आहेत. सत्तांतराच्या सत्रातून राज्य सावरत नाही, तोच इथं सत्तास्थापनेसाठीची समीकरणंही डोकं चक्रावणारी आहेत. जिथं कधी एकेकाळी विरोधी बाकावर बसणारी मंडळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत होती, त्यांपैकीच काही नावं आज सत्ताधाऱ्यांची हातमिळवणी करत सत्तेत सहभागी झाली आहेत. अशा या सत्तासमीकरणासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कैक वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना पक्षातून वेगळं होत (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्या क्षणापासून शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. याच राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीआधी अनेक राजकीय चर्चा आणि घडामोडींनंतर आपल्या पक्षाचा महायुतीला बिनशर्त पाठींबा असल्याचं जाहीर करत ते महायुतीच्या प्रचारासाठी सक्रीयसुद्धा झाले. त्यांच्या या ‘बिनशर्त’ भूमिकेवर आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.