उन्हाच्या झळा वाढल्याने चिमुकल्यांचे हाल; शिक्षण आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय..!

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई ; संपूर्ण राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याचे दिसतंय.. गेल्य वर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील अकोला, चंद्रपूरसह मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तर आताच तापमानाचा पारा 45 ते 48 अंश सेल्शियसवर गेलाय..

भारतीय हवामान विभागाने पुढील 8 दिवसांत राज्यात उष्णतेची तिव्र लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याच वेळी विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु आहेत. तळपत्या उन्हापासून चिमुकल्यांना सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी काही ठिकाणी यापूर्वीच शाळांच्या वेळा सकाळच्या करण्यात आल्या आहेत.

शाळांची वेळ सकाळची केलेली असली, तरी या शाळा दुपारी 12 वाजता सुटतात. त्यावेळी ऊन चांगलंच तापलेलं असतं नि अशा अत्यंत कडक उन्हातच बालकांना घरी परतावे लागतं. त्यामुळे मुले आजारी पडण्याची भीती व्यक्त होत आहे.. यंदाच्या कडक उन्हापासून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

शाळांच्या वेळांबाबत मोठा निर्णय..

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन शिक्षण आयुक्त मांढरे यांनी स्थानिक स्तरावर शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करावी व शाळांच्या वेळा निश्चित कराव्यात, अशी सूचना मांढरे यांनी केली आहे..

कडक उन्हामुळे बहुतांश ठिकाणी शाळांच्या वेळा सकाळच्या करण्यात आल्या आहेत, पण शाळांची सुटी दुपारी 12 वाजता होते. मात्र, चंद्रपूर, गडचिरोलीतील सध्याचे तापमान 48 अंशांवर गेलंय.. त्यामुळे 40 अंशांच्या वर तापमान गेलेले असल्यास अशा ठिकाणी दुपारी 12 वाजेऐवजी सकाळी 10 किंवा 10.30 वाजता शाळा सोडण्याचा विचार करता येईल.

स्थानिक शिक्षणाधिकारी याबाबतचा निर्णय घेऊ शकतील. आगामी काळात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज आहे. ही बाब लक्षात घेऊन उष्णतेची लाट येणाऱ्या जिल्ह्यांमधीलच शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केलं..

Leave A Reply

Your email address will not be published.