सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क
100 हून अधिक विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका आश्रम शाळेत घडला आहे. उमदीमधील आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली असून 20 विद्यार्थ्यांना मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील उमदी येथे समता आश्रम शाळेतील 100 हून अधिक मुलांना विषबाधा झाली आहे. जत तालुक्यातील उमदी गावात एका ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले जेवण उमदी गावातील समता आश्रम शाळा येथील मुलांना देण्यात आले होते.
दरम्यान सायंकाळी मुलांना ते जेवण खाल्ल्यानंतर उलट्या आणि मळमळ सुरू झाल्या. सध्या ही सर्व मुलं माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 10 मुलांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एकूण 169 रुग्ण ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे आले होते. त्यापैकी 79 रुग्ण सध्या ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. उर्वरित सर्व रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत.