निवडणुकीच्या तोंडावर RBIचा मोठा निर्णय !

कर्जदारांना मोठा दिलासा : नवीन पतधोरण जाहीर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन दोन आठवड्यांचा कालावधी उलटून गेला आहे. काही दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून त्यापूर्वीच आरबीआयने कर्जदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील बँकांची बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले नवीन पतधोरण जाहीर केले आहे.

आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, अशी घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे. त्यामुळे पुढील आढावा बैठकीपर्यंत रेपो रेट 6.50 इतका राहणार आहे. म्हणजेच देशात लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंतच्या तिहामाहीदरम्यान व्याजदरात कोणताही बदल होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही. मागील आढावा बैठकीमध्येही रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आला होता.

व्याजदरात कोणताही बदल नाही

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण आढाव्यासाठी पतधोरण निर्धारण समितीची म्हणजेच एमपीसीची नियोजित द्विमासिक आढावा बैठक 3 एप्रिल ते 5 एप्रिलदरम्यान पार पडली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. व्याजदरामध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याने एकाप्रकारे ही लोकसभा निवडणुकीआधी सर्वसामान्यांना दिलेली भेट मानली जात आहे. काहींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्याजदर कमी केली जातील अशी शक्यता व्यक्त केलेली. मात्र तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आरबीआयने आपल्या पतधोरणामध्ये सलग सातव्यांदा व्याजदर जैसे थे म्हणजेच कायम ठेवले आहेत.

बँकांनाही दिलासा

पतधोरण जाहीर करताना एमपीसीने एसडीएफचे दरही जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एसडीएफ म्हणजे बँका त्यांच्याकडी अतिरिक्त ठेवी आरबीआयकडे काही काळासाठी ठेवल्यानंतर त्यावर बँकांना मिळणारे व्याज. यंदा एसडीएफचे दर 25 टक्के असतील असे आरबीआयने जाहीर केले आहे. महागाईचा दर सातत्याने कमी होत असल्याचं प्रतिपादन दास यांनी पतधोरण जाहीर केले. महागाईचा दर 4 टक्क्यांचे लक्ष्य साध्य करेल अशी अपेक्षा दास यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.