पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाण्याच्या टाकीत पैसे टाका २० पट करून देतो असे सांगत पुण्यातील महिलेला २० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. रूममध्ये धूर करून पूजा करतो तसेच २० लाखांचे १२ दिवसात ५ कोटी होतील या अमिषाला महिला बळी पडली.
पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या नारायण पेठेतील ही घटना आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून तनवीर पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी अशा ४ जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेची प्लॉटच्या व्यवहारानिमित्त दोन महिन्यांपूर्वी तनवीर पाटील त्यांच्यासोबत ओळख झाली होती. पाटील यांनी इतरांशी संगनमत करून महिलेला वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करून देतो असे आमिष दाखवले.
१३ सप्टेंबर रोजी २०० लिटरच्या बॅरेलमध्ये वीस लाख रुपये टाकण्यास सांगितले आणि त्यानंतर त्या रूमची लाईट बंद त्या ठिकाणी आरोपींनी धूर केला. त्यानंतर महिलेला हरिद्वार येथे दर्शनाला पाठवले. महिला पूजा करून परत आल्यानंतर पाच कोटी होतील, असे आरोपींना सांगितले होते. मात्र महिला परत आल्यानंतर आरोपी पैसे घेऊन पसार झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार महिलेने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.