पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी!

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची ११९ वी जयंती जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी उपस्थितांचे तसेच शिक्षक पालक संघाच्या प्रतिनिधींचे स्वागत केले. या प्रसंगी कु.गौरी राऊत हिने नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तसेच सूत्रसंचालन केले.

यावेळी कु.ग्रीष्मा आमोदकर या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून देशभक्तांच्या महान कार्याला व समर्पणाच्या भावनेला उजाळा दिला. कु.जयदीप पाटील या विद्यार्थ्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा साकारून भारत मातेचा जयजयकार केला. कु.रेयांश भारंबे या विद्यार्थ्याने आपल्या भाषणातून लाल बहादूर शास्त्रींच्या असीम कार्याचा प्रेरणा पट श्रोत्यांसमोर प्रस्तुत केला. याप्रसंगी महात्मा गांधी यांचा जीवनपट उपस्थित विद्यार्थ्यांसमोर उलगडला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी द.आफ्रिकेतील रेल्वेस्थानकावरील दिलेली अपमानास्पद वागणूक,त्यातून देशाला जुलमी इंग्रजी राजवटीपासून मुक्त करण्याचा निग्रह, जालियानवाला बाग हत्याकांडाचे उत्तर, सत्य आणि अहिंसामय लढ्यातून देण्याचा संकल्प, असहयोग आंदोलन, दांडी यात्रा-मिठाचा सत्याग्रह, स्वदेशी मोहीम, भारत छोडो आंदोलन व भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य या प्रसंगाचे नाट्यमय आणि रोमांचकारी प्रस्तुतीकरण विद्यार्थ्यांनी केले.

शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी थोर राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यासमोर मांडले व त्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी प्रेरित केले. संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. सत्य व अहिंसा ही तत्वे भारताने जगाला दिली आहेत व आधुनिक काळातही भारताने सत्याची बाजू घेत अहिंसामय भूमिका बजावली आहे. शास्त्रीजींच्या जय जवान,जय किसान या घोषवाक्याला जय विज्ञान आणि जय अनुसंधान हे शब्द जोडले जावेत ही काळाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रसेवेला सर्वोच्च प्राथमिकता देणाऱ्या या महान नेत्यांचा हा देश नेहेमीच ऋणी राहील असा विश्वास दर्शविला. विद्यार्थी जीवनात शिक्षणाला सर्वोच्च महत्व देवून सत्याची कास धरली पाहिजे असा उपदेश केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून महान देशभक्तांसाठी दर्शविलेल्या आदर व सन्मानाची त्यांनी विशेष प्रशंसा केली. या प्रसंगी शाळेचे उप-मुख्याध्यापक दिपक भावसार, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमास उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.