निजामपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क
सरवड- ब्राम्हणवेल हायवेच्या कामात निजामपूर गावात मुख्य जलवाहिनी तुटली. लगतच्या नागरिकांसाठी दीड महिन्यापासून गंभीर पाणी संकट उभे राहिलेले आहे. अखेर ग्रा. पा. ने समस्या निवारणासाठी लक्ष घातले. नळाद्वारे पाणी देण्यासाठी सज्जता केली आहे. सतत दीड महिना अशा संकट काळात ग्रा.पा. ने लोकांच्या मागणीनुसार घरो घरी टँकरद्वारे पाणी पुरवले आहे.
शासनासह सर्वांनी कानावर हात ठेवलेत की काय अशी स्थिती असतांना शेवटी ग्रा.पा.ने दखल घेतली. अन्यत्रहुन जलवाहिनी जोडणे सुरू केले. म्हणतात ना, “गाव करी ते राव काय करी”. आझाद चौकापासून ग्राम पालिकेपर्यंत दुतर्फा व मागे कुंभार वाड्यातील घरांना दीड महिन्यांपासून होणारा नळ पाणी पुरवठा
ठप्प झाला. ऐन उन्हाळ्यात लोकांना नळपाणी येणे बंद झाले. लोक हैराण होत आहेत. प्रा. नरेंद्र तोरवणे यांनीही जलजीवन विभागाशी सतत पाठपुरावा चालू ठेवला आहे.
ग्रा. पा. ने केले नियोजन
ग्राम विकास अधिकारी राहुल मोरे, सरपंच सोनाली भूषण वाणी, सदस्य आदींनी गुरुवारपासून मंदिर गल्लीपर्यंत आलेली जलवाहिनी आडव्या चरनी रोडच्या जलवाहिनीशी जोडण्याचे काम युद्ध पातळी वर चालू केले. शनिवारी सायंकाळी त्यांना यश आले आहे. त्यामुळे चरनी रोड व पुढे कुंभारवाड्यात पाणी पुरवठा सुरू होईल. त्याच सोबत मेन रोडच्या घरांना नवीन जोडलेल्या जलवाहिनीतून तातडीचे कनेक्शन देऊन पाणी पुरवठा सुरू करणार असल्याचे सरपंच सोनाली वाणी व प्रतिनिधी भूषण बाबूलाल वाणी यांनी लोकशाहीशी बोलतांना नमुद केले.
हायवे पूर्ण झाल्यावर जलजीवन मिशन दुतर्फा मुख्य जलवाहिन्या टाकतील तो पर्यंत मेनरोड लगतच्या पाणी प्रश्नी त्रस्त नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार असल्याचे समाधान व्यक्त होत आहे.