वीज उपकेंद्राच्या ठेकेदाराकडुन वीजवाहीनीसाठी अवैध वृक्षतोड; तालुक्यातील वृक्षसंवर्धन धोक्यात!

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

भररस्त्यात दिवसढवळ्या सर्रासपणे मोठमोठी डेरेदार हिरव्या झाडांच्या फांद्या छाटुन परस्पर अवैधरित्या लाकडे लंपास होण्याच्या प्रकाराकडे संबधित जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील वृक्षसंवर्धन धोक्यात आले आहे. मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील मौजे दुई येथील विजउपकेंद्राचे नव्याने काम होत आहे. सदर उपकेद्रातुन जाणाऱ्या वीज वाहीन्या उभारणीचे काम रस्त्यांच्या दुतर्फा होत असुन सदर काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडुन मनमानी व चुकीच्या पद्धतीने केले जात आहे. सदर वीजवाहीनीची पोललाईन रस्त्यांवरील झाडांपासुन सुरक्षित अंतर न ठेवता अगदी झाडांच्या लागुनच टाकली जात असल्याने शेकडो वृक्षांवर करवत चालत आहे. अनेक वृक्ष यामध्ये कापली केली असुन आणखी शेकडो वृक्षांवर कत्तलीची टांगती तलवार आहे.

याबाबत अधिक चौकशी केली असता सा.बा.विभागाच्या हद्दीतर्गत असलेली झाडे छाटण्याची अशी कोणतीही पुर्वपरवानगी न घेता उपकेंद्राचे काम पहाणाऱ्या संबंधित ठेकेदाराने सा.बा.विच्या हद्दीतील मोठमोठी डेरेदार हिरव्या सदृढ झाडांच्या शेजारुन नवीन पोल लाईन टाकली असुन वीजतारांना आड येणारी असंख्य झाडे छाटुन तर काही झाडांचे शेंडे कापुन तब्बल दोन ट्रक लाकडे अवैधरीत्या लंपास केल्याचा प्रकार तालुक्यात घडला आहे. तोडलेली लाकडे परस्पर भरतांना काही सुज्ञ लोकांनी विचारणा करताच ठेकेदाराने सदर लाकडे उपकेंद्राच्या आवारात खाली करत उडवाउडवीची कारणे सांगत वेळ मारली. मात्र उपकेंद्राच्या आवारातील लाकडे रात्रीतुन गायब झाली.

दरम्यान याबाबत सा.बा.विभागाचे अधिकारी यांचेकडे परवानगीबाबत विचारणा केली असता अशी कोणतीही परवानगी संबंधितांनी घेतली नसल्याचे कळते. वाहतुकीबाबत वनाधिकारी यांनीही याबाबतीत वाहतुक पाससाठी परवानगी घेतली नसल्याचे समजते. मग संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची छाटणी कुणाच्या परवानगीने केली? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत तोडलेल्या लाकडांची परस्पर अवैधरीत्या लंपास करण्यामागे कुणाचे सहकार्य? वीजवाहीनीचे पोल व लाईन झाडांपासुन सुरक्षित अंतरावर न टाकता झाडांना लागुन का टाकण्यात आली? यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होईलच पण वादळी वाऱ्याने भविष्यात शेजारील झाडांमुळे गंभीर अपघातही होऊ शकतो.

दरम्यान या प्रकारामुळे तालुक्यातील वृक्षसंवर्धन धोक्यात आले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वृक्षांचे संगोपण व जबाबदारी असणाऱ्या सा.बा.विभाग, महसुल विभागाच्या जबाबदार अधिकारी यांना सदर प्रकार दिसला नसेल का? असे अनेक प्रश्न परीसरातुन चर्चिले जात आहे. यासंदर्भात मुक्ताईनगर तहसीलदार यांचेकडे लेखी स्वरुपात तक्रार दिलु असुन, योग्य चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी व सदर वीजवाहीनी वृक्षांपासुन सुरक्षित अंतरावरुन उभारण्यात यावी जेणेकरुन वृक्षसंवर्धनास बाधा पोहचणार नाही व भविष्यात वादळामुळे वीजवाहीनीवर झाडे पडुन अपघात घडणार नाही. अशी मागणी महसुल प्रशासनाकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाकडून संबंधितांवर काय कारवाई होते याकडे वृक्षप्रेमींचे लक्ष लागुन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.