मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
MPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे.. राज्य लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
वयोमर्यादेच्या अटींमध्ये अमर्याद संधी देण्याचा निर्णय घेतला असून लोकसेवा आयोगाच्या या निर्णयामुळे परीक्षार्थींच्या गुणवत्तेला योग्य न्याय मिळणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ट्विटरवरून आयोगाने या संदर्भात माहिती दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. pic.twitter.com/C7I315Xzbo
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 15, 2022
MPSC परीक्षा देणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये आहे. मात्र प्रत्येकजण MPSC परीक्षा पास होईलच असं नाही. तरीही अनेकजण अनेकदा परीक्षा देत असतात आणि उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच काही उमेदवारांसाठी MPSC ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पदभरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल संधींबाबत फेरबदल केला आहे. उमेदवारांच्या कमाल संधींची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
या आधी एमपीएससीने निश्चित केलेल्या वयोमर्यादेत उमेदवाराला कितीही वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होती. मात्र निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून एमपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर खुल्या गटातील उमेदवारांना कमाल 6 संधी, उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल 9 संधी निश्चित केल्या, तर अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले होते. मात्र या निर्णयाला विरोध झाला होता. म्हणूनच आता एमपीएससीकडून या निर्णयात फेरबदल करण्यात आला आहे.
MPSC परीक्षेसाठी आतापर्यंत किती वेळा परीक्षे देता येणार याबद्दल अट ठेवण्यात आली होती. उमेदवारांनी कमाल मर्यादेत परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांना पुन्हा परीक्षा देता येत नव्हती, मात्र MPSC तर्फे आता यात बदल करण्यात आल्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयाचा फायदा
या अगोदर परीक्षा देण्याच्या संधीवर मर्यादा असल्यामुळे दिलेल्या संधींमध्येच विध्यार्थ्यांना परीक्षा देण्यास संधी मिळत होती. त्यामुळे अनेकांना वयोमर्यादा संपल्यावर परीक्षा देता येत नव्हत्या. त्यानंतर इच्छा नसतानाही इतर पर्यायी मार्गांचा स्वीकार करावा लागत असे. आता मात्र तसे होणार नाही. काही वेळेस अपयश आले तरी वयोमर्यादा आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ही बातमी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह नक्कीच वाढवणारी असून या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडूनही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
l