नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांतील मतदान प्रक्रिया कधीच संपली असून आता सर्वांच्या नजरा 4 जूनच्या निकालाकडे लागल्या आहेत. आता विजय-पराभवासोबतच कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान? याचेही अंदाज बांधले जात आहेत. राजकीय विश्लेषक आणि स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अनुभवावरून अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, यावेळी महाराष्ट्रात एनडीएला 20 जागांचे नुकसान सहन करावे लागू शकते.
राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता, मला असे वाटते की, इथे एनडीएच्या हातून 20 जागा जाण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रातील निवडणूक खरी शिवसेना कोणती याबद्दल होती? मुंबईतल्या निवडणुकीत तर स्पष्टच झाले की, खरी शिवसेना कोणती. खरी राष्ट्रवादी कोणती? याबाबत शरद पवारांचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्रात 20 जागा गमावेल
योगेंद्र यादव पुढे बोलताना म्हणाले की, “गेल्या वेळी महाराष्ट्रात एनडीएला एकूण 42 जागा मिळाल्या होत्या, पण यावेळी मला 22 पेक्षा जास्त जागा दिसत नाहीत. जे 20 जागांचे नुकसान आहे, त्यात भाजपचे नुकसान फक्त 5 जागांचे आहे. 15 जागांचे नुकसान इतर आघाडीच्या साथीदारांचे आहे. माझा स्वतःचा समज आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अवस्था निवडणुकीनंतर वाईट होईल. या निवडणुकीत त्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.
महाराष्ट्रात भाजपला किती जागा?
योगेंद्र यादव पुढे बोलताना म्हणाले की, “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा लढवल्या आहेत. त्यामुळे भाजपला जास्त जागांचे नुकसान होणार नाही. त्यामुळे भाजपला 4-5 जागांचे नुकसान सोसावे लागणार आहे.” दरम्यान, महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांसाठी 5 टप्प्यात मतदान झाले आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी फार वेगळी आहे. महाराष्ट्रात दोन आघाड्या आहेत. महायुती आणि इंडिया आघाडी अंतर्गत महाविकास आघाडी महायुतीत भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्रातील निवडणूक निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.