लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात तापमानात वाढ होत असतांनाच पुन्हा थंडी जाणवायला लागली आहे. महाराष्ट्रात मागील चार दिवसांपासून तापमानाचा पारा वाढलेला असताना मध्य मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत दोन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर विदर्भ व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात याचा प्रभाव अधिक असेल. राज्यातील तापमानात सातत्याने चढउतार होत आहेत.
राज्यातील उत्तरेत किमान तापमानात होणारी घट कायम आहे. धुळे, पुणे नाशिक, आणि औरंगाबाद येथे किमान तापमानात 10 अंश सेल्सियसच्या आसपास तापमान नोंदवले गेले. विदर्भासह मराठवाड्यातही तापमानात घट झाली आहे.मागच्या 24 तासांत सोलापूर जिल्हयात 37.2 अंश तापमानासह उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर धुळे जिल्हयात 8 अंश सेल्सियस एवढे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले. मुंबईकरांना दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. रविवारी मुंबईत 36 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. 15 फेब्रुवारीनंतर तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.