जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरात काल रात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसाने पाण्याने रामेश्वर कॉलनी मेहरून येथे अंबरझरा पाटचारीमधून पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पाणी बांधावरून नागरिकांच्या घरात शिरले. दरम्यान प्रशासनाच्या निदर्शनास आले असता प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांनी त्या ठिकाणी तातडीने भेट देऊन 2 जेसीबी 1 पोकलँड मशीन लावून पाण्याच्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबींचा निचरा करून पाणी वाहून जाण्यासाठीची व्यवस्था तातडीने प्रशासनामार्फत करण्यात आली.
तसेच काव्यरत्नावली चौक, हॉटेल रॉयल पॅलेस समोरील चोकप, एसएमआयटी कॉलेज मार्ग या ठिकाणी अडलेल्या पाण्याची वाहून जाण्याची वाट मोकळी करून देण्यात आली. तसेच द्वारका नगर येथील रहिवासी नागरिकांनी प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांना तक्रार दिली. त्यावर कायमस्वरूपी समस्या सोडवण्यासाठी करावयाच्या उपाय योजनेचा प्रस्ताव मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदरील काम हाती घेण्यातील असे संबंधित नागरिकांना यावेळी सांगण्यात आले. यावेळी सहआयुक्त गणेश चाटे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, सहाय्यक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील, आरोग्य निरीक्षक कांबळे आणि किरंगे यांच्यासह अधिकारी, कामगार वर्ग उपस्थित होता.