जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
‘प्रत्येक मूल जन्माला येताना उद्यमशीलता आणि नेतृत्व हे गुण घेऊन येते. भारतीय तरुणांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. गरज आहे ती, त्यांच्यातील या गुणांना चालना देऊन उद्यमशील आणि नेतृत्वक्षम बनविण्याची. त्यामुळे तरुणांनीही आपल्यातील क्षमता ओळखून उद्यमशीलतेला प्राधान्य देत व्यवसाय उभारावा, असे मत जी. एच. रायसोनी मेमोरियल टॉकमार्फत स्व.ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या “चाणक्य-फॉर कॉर्पोरेट लीडरशिप” या विषयावरील व्याख्यानात चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लीडरशीपचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध लेखक तसेच मॅनेजमेंट गुरु डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी व्यक्त केलं.
ता. ३० शुक्रवार रोजी शहरातील खानदेश सेंट्रल मॉलमधील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अविनाशजी रायसोनी, महेन्द्रजी रायसोनी, रमेश जाजू, जोत्स्ना रायसोनी, रायसोनी इस्टीट्युटचे कार्यकारी संचालक प्रितमजी रायसोनी, राजुल रायसोनी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. त्यात त्यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाची शैक्षणिक व उपक्रमाची माहिती देत जळगाव शहरातील उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी, आम्ही भारतातील सर्वात लोकप्रिय लेखक – डॉ. राधाकृष्ण पिल्लई यांना आमंत्रित केले असून कौटिल्याच्या अर्थशास्त्रावर ते नक्कीच आपल्याला विस्तृत व संशोधीत मार्गदर्शन करतील असे नमूद केले. एकदा सुरुवात केल्यावर मध्येच थांबू नका. तुमचे काम पूर्ण निष्ठेने करा. बरेच लोक विचारांची देवाणघेवाण करण्यात अयशस्वी होतात.
व्यवसाय करताना धीर अधिक महत्त्वाचा असतो. आचार्य चाणक्य म्हणतात की, व्यवसाय हा रोपटासारखा असतो. त्याचे झाडात रुपातंर व्हायला वेळ लागतोच.व्यवसाय सुरू करता तेव्हा तुमच्या कामाची माहिती इतर कोणाला देऊ नका. तुमची योजना कोणाशीही शेअर करू नका. कोणतेही काम करताना मनोबल खच्ची करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. जर तुम्हाला कोणी सल्ला देत असेल की तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही, तर त्यांच्या बोलण्याने विचलित होऊ नका. अशा लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय सुरू केल्यानंतर, पूर्ण मेहनत घेऊन आपले काम करा. यश नक्कीच मिळेल असे त्यांनी यावेळी नमूद केले. प्रा. राहुल त्रिवेदी व प्रा. अंजली बियाणी यांनी अभ्यासपूर्ण निवेदनाने कार्यक्रमाची धुरा पेलली तर रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांची ही संकल्पना होती.