जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क
एकविसावे शतक हे अत्यंत धकाधकीचे आणि धावपळीचे आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव प्रायोजित खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण व आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर नुकतेच राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रामध्ये देशभरातून शंभर संशोधक विद्यार्थी तसेच प्राध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. साहेबराव भुकन हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. आर. चौधरी यांनी केले. डॉ. निलेश जोशी यांनी सूत्रसंचालन तर डॉ. केतन चौधरी यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. अनिकेत अंबेकर (वर्धा) यांनी मुख्य व सूक्ष्म पोषक तत्वे, प्रा. संजय हिरोडे (अमरावती) यांनी निरोगी जीवनशैली, प्रा. राजेंद्र शेळके (मुंबई) यांनी आहार व आरोग्य, डॉ. गोविंद मारतळे (फैजपूर) यांनी समतोल आहार व जीवनशैली, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर (जळगाव) यांनी क्रीडा पोषण या विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अशोक राणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात वाढत्या वयोमानानुसार बदलत जाणारी जीवनशैली आणि आपण घेत असलेला आहार या विषयावर प्रकाश टाकला. या चर्चासत्रात अकरा संशोधक विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले व या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. संजय चौधरी, प्रा. संजय हिरोडे व प्रा. राजेंद्र शेळके यांनी भूषविले.